बऱ्याच चढ उतारानंतर स्टार प्रवाहची मालिका घेणार निरोप…२६ मे रोजी प्रदर्शित होणार शेवटचा एपिसोड
![star pravah serial latest news](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/05/765342635647675.jpg)
ट्विस्ट अँड टर्न्समुळे मालिका बरेच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला की आपोआप मालिकेलाही उतरती कळा लागते. परिणामी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे मालिकेला डच्चू देण्यात येतो. असाच काहीसा प्रकार स्टार प्रवाहच्या मालिकेबाबत झाला आहे. या वाहिनीवर येत्या २७ मे पासून येड लागलं प्रेमाचं ही मालिका दाखल होणार आहे. त्यामुळे एका मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. अर्थात कमी झालेल्या टीआरपी मुळेच या मालिकेला डच्चू द्यावा लागत आहे. कारण ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या यादीत १७ व्या स्थानावर जाऊन पोहोचली आहे. त्याचमुळे वाहिनीने मालिकेला डच्चू दिला आहे.
![pinkicha vijay aso serial](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/05/35467543545766756.jpg)
स्टार प्रवाहची निरोप घेत असलेली ही मालिका आहे पिंकीचा विजय असो. येत्या २६ मे रोजी पिंकीचा विजय असो या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होत आहे. ही मालिका प्रेक्षकांना रात्री ११ वाजता पाहायला मिळत होती. पण आता ही मालिका निरोप घेत असल्याने या वेळेत सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे रात्री १० वाजता येड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पिंकीचा विजय असो ही मालिका जानेवारी २०२२ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शरयू सोनवणे हिने तिच्या अभिनयाने मालिका चांगलीच गाजवली होती. पण पारू या मलिकेसाठी तिला विचारण्यात आल्याने पिंकीचा विजय असो या मालिकेतून तिने काढता पाय घेतला. याचदरम्यान शरयुने खऱ्या आयुष्यात साखरपुडा केला असल्याची घोषणा केली होती. पण मालिकेला निरोप दिल्यानंतर लवकरच एका नवीन भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे तिने म्हटले होते.
![star pravah serial pinkicha vijay aso news](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/05/3456756325436564.jpg)
मात्र शरयूच्या जाण्याने पिंकीचा विजय असो या मालिकेला उतरती कळा आली. पिंकीची भूमिका अभिनेत्री आरती मोरे साकारू लागली तेव्हा प्रेक्षकांनी तिला नाकारलेले पाहायला मिळाले. पण शो मस्ट गो ऑन म्हणत आरतीने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. कशीबशी रखडत ही मालिका तिने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या चढ उतारानंतर आता स्टार प्रवाह वाहिनीनेच मालिकेचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता प्रेक्षकांची हीच इच्छा समजून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. येत्या २६ मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.