ओंकार भोजने पाठोपाठ गौरव मोरेची हास्यजत्रेमधून एक्झिट…मराठी कार्यक्रमांला रामराम ठोकून ३ महारथी हिंदी मंचावर
![gaurav more kushal badrike in madness machayenge](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/04/7645352536453465464.jpg)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या शोमधून एकेक कलाकार काढता पाय गजेऊ लागले आहे. कोहिनूरचा हिरा ओंकार भोजने याच शोमध्ये मराठी प्रेक्षकांना गवसला होता. तर फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याच्या स्कीट्सची सगळेचजण आतुरतेने वाट पाहत असतात. पण हे दोन्ही महारथी आता या शोमध्ये नसल्याने शोची मजाच निघून गेली आहे अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर ओंकार भोजने महाराष्ट्राची हास्यजत्रामधून खूप अगोदरच बाहेर पडला होता. पण त्यानंतर शोमधून अनेक कलाकारांची गळती सुरू झाली. विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे यांनीही शोमधून काढता पाय घेतला.
![gaurav more in maharashtrachi hasyajatra](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/04/436745534656457567786.jpg)
पण त्यानंतर गौरव मोरे, समीर चौघुले, नम्रता संभेराव, वनिता खरात यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. पण गौरव मोरे देखील गेल्या काही महिन्यांपासून या शोमधून गायब झालेला आहे. अर्थात गौरव मोरे आता चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारू लागल्याने आणि शुटिंगमधून वेळ मिळत नसल्याने तो हास्यजत्रा मध्ये येऊ शकत नव्हता. गेल्याच वर्षात त्याचे तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. तर लवकरच त्याचा प्रमुख भूमिका असलेला महापरिनिर्वाण हा चित्रपट आणि आल्याड पल्याड हा कॉमेडी थ्रिलर चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. पण आता गौरव मोरे कडे एक मोठी संधी चालून आलेली आहे. सोनी वाहिनीच्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या रिऍलिटी शोमध्ये गौरवला आमंत्रित करण्यात आले आहे. चला हवा येऊ द्या नंतर कुशल बद्रिके तसेच हेमांगी कवी या शोमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले होते पण शोची मजा वाढवण्यासाठी आता गौरव मोरेची त्यांना साथ मिळणार आहे.
त्यामुळे गौरव मोरे सध्या यशाची एक एक पायरी पुढे सर करताना दिसत आहे. त्याला मिळालेली ही संधी पाहून चाहत्यांना खरोखरच आनंद झाला आहे. पण यामुळे गौरव मोरे ने हास्यजत्रा सोडली का? असा प्रश्न त्याला विचारण्यात येऊ लागला आहे. खरं तर ज्या शोमुळे गौरव मोरेला ही प्रसिद्धी मिळवून दिली आहे त्या शोचा तो एक महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे त्याने हास्यजत्रेत परत यावे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान एकीकडे त्याला मिळत असलेल्या या संधीमुळे गौरव त्याचे नाव नक्कीच लौकिक करणार आहे. हिंदी प्रेक्षकांनाही त्याच्या अभिनयाचे वेड लागावे अशी तो स्वतःची ओळख बनवू शकतो. त्यामुळे मिळालेल्या संधीचे त्याने सोनं करावं अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. तीन मराठी चेहरे हिंदी सृष्टी गाजवतायेत हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल.