तुझ्यामुळे मी गमावलंय माझ्या मुलाला चालती हो इथून….अरुंधतीच्या नवीन प्रवासावर प्रेक्षकांची आगपाखड
![aai kuthe kay karte serial news](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/03/7654321254356456.jpg)
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेला धक्कादायक वळण मिळणार आहे. कारण आता अशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरण्यात येणार आहे. अरुंधतीच्या भावविश्वाचा प्रवास या मालिकेतून दाखवण्यात आला होता. अनिरुद्ध सोबत लग्न केल्यानंतर तिला घर संसार आणि मुलं सांभाळण्या पलीकडे दुसरे काही करता येत नव्हते. मुलांची जडणघडण आणि अनिरुद्धचे बोलणे खातच अरुंधती तिचं आयुष्य जगत राहिली होती. पण कालांतराने आशुतोषच्या येण्याने तिच्या आयुष्याला नवे रंग चढले होते. अनिरुद्धला घटस्फोट देऊन ती आशुतोषसोबत दुसरा संसार थाटताना दिसली. मात्र आता अरुंधतीच्या आयुष्यात पून्हा एक मोठं वादळ येणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे.
![aai kuthe kay karte serial news](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/03/345756532535475687.jpg)
ज्यात आशुतोषचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आशुतोषच्या फोटोला हार घातल्याने मालिकेचा हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनाच मोठा धक्का बसला आहे. मालिकेच्या या ट्विस्टमध्ये आणखी एक ट्विस्ट घुसडण्यात आला असून अशुतोषची आई अरुंधतीला घरातून हाकलून देताना दाखवली आहे. अशुतोषच्या मृत्युला तूच जबाबदार आहेस असे गृहीत धरून ‘ तुझ्यामुळे मी गमावलंय माझ्या मुलाला चालती हो इथून’…असा थेट ईशाराच अरुंधतीला मिळाला आहे. अशातच हतबल झालेल्या अरुंधतीला कांचन आजी आई बनून आसरा देताना दिसणार आहे. कांचन आजी आता अरुंधतीच्या बाजूने बोलू लागल्याने मालिकेचा हा तिसरा ट्विस्ट प्रेक्षकांना पचनी पडत नाहीयेत. आणि म्हणूनच एका सुनेला घरातून हाकलून देताना तिची काहीच किंमत न ठेवल्याने प्रेक्षकांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.
![aai kuthe kay karte arundhati](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/03/46547435424647886876.jpg)
प्रत्येकवेळी एका महिलेच्या बाबतीत अशी अवहेलना मालिकेतून दाखवणे थांबवायला हवे अशी अपेक्षा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. तिच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी का नाही घडत. केवळ नकारात्मकता दाखवून समाजात स्त्रीबद्दल काय आदर्श ठेवायचा यावर लेखकाने विचार करणे गरजेचे आहे. वाईट घडलं की हे तुझ्यामुळे घडलं असं म्हणून आगीत तेल ओतण्याचे काम केले जात आहे. किमान मालिकेतून तरी अशा गोष्टी दाखवणे थांबवायला हव्यात अशी मागणी प्रेक्षक करू लागले आहेत.