काहीही हं श्री.. धडक बसली आणि अंगठी चक्क नायिकेच्या बोटात सीन पाहून प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात

तुम्हाला जर केवळ मनोरंजन म्हणून पहायचे असेल तर कुठल्याही मालिका किंवा चित्रपटात लॉजिक शोधायला जाऊ नका, नाहीतर तुमचा हिरमोड झालाच म्हणून समजा. आता बॉलिवूड, टॉलिवूड चित्रपटात बघायला गेलं तर एकटा हिरो शंभर जणांना मारेल एवढी त्याच्यात ताकद संचारलेली असते. तिथेच हिंदी मालिकांमध्ये पाहिलं तर तुम्हाला अनपेक्षित घटना घडताना पाहायला मिळतील. आता आपल्या मराठी मालिकेतही अशी दृश्य पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांनी यावर हसावं की रडावं असा प्रश्न त्यावर उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेली स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी ‘ ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत ३ ऱ्या क्रमांकावर प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.

कला आणि अद्वैत हे दोघे या मालिकेचे खरे नायक नायिका आहेत. पण अद्वैतचे नयनासोबत लग्न जुळवण्याची धडपड मालिकेत सुरू आहे. अशातच आता दोघांच्या साखरपुड्यासाठी अंगठीची खरेदी करण्यात येत आहे. तेव्हा नयना आणि चांदेकर कुटुंब दुकानात असतानाच कला तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. आता मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांना अक्षरशः एक प्रश्न पडला आहे. कारण अद्वैत आणि कलाची एकमेकांना धडक बसते त्यात अद्वैतच्या हातात असलेली अंगठी बरोबर कला च्या बोटात जाते. मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर “काहीही हं श्री..” अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून देण्यास सुरुवात झाली आहे. अद्वैत धडकल्यानंतर नेमका कलाच्याच बोटात अंगठी का घालतो हे न समजणारे ट्विस्ट या मालिकेतून पाहायला मिळत आहेत.
जे प्रत्यक्षात कधीही शक्य नाही अशा गोष्टी मालिकेत दाखवल्यामुळे ही अतिशयोक्ती पाहून खरोखरच त्या क्षणी हसायला आल्याशिवाय रहावत नाही. लेखकाने आणि दिग्दर्शकाने जो अंगठी बोटात घालण्याचा घाट घातला आहे तो वास्तवाला धरून नसल्याने मालिकेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. याच मालिकेत देवीच्या सोहळ्यात गोंधळ उडतो तिथे अद्वैतच्या हातातून ताट उडते त्या ताटातले कुंकू थेट कला च्या भांगेत जाते. इथेही प्रेक्षक लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरलेला पाहायला मिळतो. त्यामुळे मालिकेतून निव्वळ मनोरंजन हवे असेल तर आणि तरच या मालिका तुम्हाला पाहायला आवडेल. अन्यथा त्यावर हसून गप्प बसून राहणे एवढेच काय ते होऊ शकते.