![nagraj manjule life story](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2023/11/436576453245356476575.jpg)
नागराज मंजुळे यांची निर्मिती आणि अभिनय असलेला ‘नाळ २’ हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांची टीम ठिक ठिकाणी जाऊन जोरदार प्रमोशन करत आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही चित्रपटाकडे खेचण्यासाठी नागराज मंजुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांचा उलगडा केला. नागराज मंजुळे यांच्या काकांना मुल नसल्याने त्यांचे बालपण आणि सातवी पर्यंतचे शिक्षण काकांनी केले होते. पण मुलगा खूप मस्तीखोर आहे आणि तो हाताबाहेर जाऊ नये म्हणून वडिलांनी त्याला घरी आणले. या एवढ्या लहान वयातच नागराज मंजुळे गावातल्या अन्न धान्याची चोरी करायचे आणि ते दुकानात नेऊन विकायचे. मिळालेल्या पैशातून ते पार्टी करायचे.
![nagraj manjule wedding photos](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2023/11/436576342346465.jpg)
चित्रपट पाहायला जाणं, शाळा बुडवणं, उधारी करणं, चौथी इयत्तेत असतानाच दारू पिणे, गांजा, सिगरेट ओढणे या गोष्टी इतक्या वाढल्या की उधारी देणाऱ्यानेच एकदिवस वडिलांकडे पैसे मागितले. तेव्हा त्यांच्या वडिलांना यावर अजिबातच विश्वास बसला नव्हता. त्यानंतर मात्र वडिलांनी त्यांना जेऊरमध्ये आपल्या सोबत राहायला आणले. त्यानंतर मात्र बाकीच्या मुलांकडे पाहून त्यांनी सगळ्या वाईट सवयी बंद केल्या. अशा वाईट सवयी बंद होण्यामागे आणखी एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे मुली. एखादी मुलगी आपल्याकडे पाहते आणि तिला आपण दारू पितोय हे समजलं तर आपली बदनामी होईल याही भीतीने त्याने व्यसन सोडून दिले. लहान असताना आपण कोणी दलित आहोत याची जाणीव नव्हती पण जसजसे कळायला लागले तसतसे लोकांकडून अनुभव मिळत गेले असे नागराज मंजुळे म्हणतात. याबद्दल एक किस्सा सांगताना ते म्हणतात की, मी जेव्हा हापस्यावर पाणी भरायला जायचो तेव्हा काही लोक त्या हापस्याला हात लावून देत नव्हते. एकदा शाळेच्या जवळच्या रेल्वे ट्रॅक वर डुक्कर मरून पडले होते. तेव्हा एक रेल्वे खात्यात काम करणारा व्यक्ती आमच्या घरी ते सांगायला आला आणि ते मेलेले डुक्कर उचलायला सांगितले. मला त्या गोष्टीचा राग आला की, ‘आम्हीच का?. आम्हाला कशाला काढायला सांगता.
![nagraj popatrao manjule with big b](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2023/11/4365756434453654676.jpg)
तुम्ही स्वतःच त्याला कसं काढायचं ते बघा.’ असे म्हणताच त्या व्यक्तीला राग आला आणि तो तिथून निघून गेला. तेव्हा आईनेच मला यात लक्ष नको देऊ म्हणून सांगितले. दुसरा असाच एक प्रकार माझ्या भावासोबत घडला. माझा भाऊ चांगले शिक्षण घेत होता तो शाळेत हुशारही होता पण पाण्याच्या जवळ एका खड्ड्यात डुक्कराचे पिल्लू पडले म्हणून त्याला ते काढायला सांगितले. मला त्या गोष्टीचाही राग आला की तू ते का काढलंस म्हणून मी त्याला ओरडलो. मला माहितीये तू प्राण्यांवर दया दाखवली पाहिजे पण तूच का? त्या शंभर जणांना का वाटलं की हे तूच काढलं पाहिजे. अशा गोष्टी आजही कुठे घडत असतील पण आता समाज बदलू लागला आहे. जातीपातीच्या गप्पा न मारता एक माणूस म्हणून बघू लागले आहेत. फँड्री चित्रपट मी याच अनुभवातून बनवला होता. फँड्री चित्रपटाचे लंडनमध्ये स्क्रिनिंग पार पडले होते तेव्हा तिथल्या एका महिलेने मला एक प्रश्न विचारला की, ‘तुम्ही खूप जुन्या गोष्टी दाखवता आताच्या जमान्यात असं काही नसतं. ६०, ७० च्या दशकातली कहाणी तुम्ही इथे दाखवता.’ यावर नागराज मंजुळे यांनी म्हटले होते की, ‘जोपर्यंत तुम्ही अशा परिस्थितीतून जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची समस्या जाणवणार नाही.’