![actor kaustubh diwan wedding kelwan](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/03/3464734563547665758667.jpg)
जुळून येती रेशीमगाठी ही झी मराठी वरची मालिका आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहे. आदित्य आणि मेघनाची लग्नानंतरची प्रेमकहाणी मालिकेत दाखवण्यात आली होती. याच मालिकेतील एक प्रसिद्ध कलाकार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच या अभिनेत्याचे केळवण सेलिब्रिटींकडून मोठ्या थाटात साजरे करण्यात आले. हा अभिनेता आहे कौस्तुभ दिवान. कौतुभने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून आदित्य नगरकर म्हणजेच मेघनाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती. मेघना धाडे, शिल्पा नवलकर, शाल्मली तोळे, स्वप्नाली पाटील, आस्ताद काळे, राजन ताम्हाणे या सेलिब्रिटींनी कौस्तुभचे केळवण साजरे केले. यावेळी कौतुभची होणारी पत्नी कीर्ती कदम हिलाही आमंत्रित करण्यात आले होते.
![kaustubh diwan wedding kelwan](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/03/765423253544245364564.jpg)
कौस्तुभ आणि कीर्ती या दोघांनी जानेवारी महिन्यात मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच या सेलिब्रिटींनी त्यांचे केळवण साजरे केले. “असेच प्रेम राहू!” असे म्हणत केळवणाच्या सोहळ्याची खास आठवण कौस्तुभने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. येत्या काही दिवसातच कीर्ती आणि कौस्तुभ विवाहबद्ध होत आहेत. कौस्तुभ दिवान बद्दल सांगायचं झालं तर मालिका सृष्टीतील तो एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखला जातो. त्याने वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकेत काम केलेले आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो उत्तम लेखक देखील आहे. बऱ्याचशा मालिकांसाठी त्याने लेखन केले असून त्याच्या कामाचं वेळोवेळी कौतुकही झालं आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे कौस्तुभला चांगली लोकप्रियता मिळाली होती. बंध रेशमाचे, घर श्रीमंताच, कोड मंत्र, सिटीझन, जेता, प्रेम कहाणी एक लपलेली गोष्ट अशा चित्रपट, नाटक तसेच मालिकेतून तो विविधांगी भूमिकेत झळकला आहे.
![kaustubh diwan and kirti pre wedding photos](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/03/76543131435346456.jpg)
वेगवेगळ्या मंचावर त्याने निवेदक म्हणूनही काम केलेले आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे या सोनी मराठीवरील मालिकेत त्याने एक छोटेसे पात्र साकारले होते. स्टार प्रवाहच्या आंबट गोड या मालिकेत तो स्त्री भूमिकेत दिसला होता. अभिनय आणि लेखन क्षेत्रातील त्याचा प्रवास अविरत चालूच आहे. अशातच आता तो लवकरच विवाहबद्ध होत आहे. त्यामुळे सेलिब्रिटींकडून त्याचे केळवण साजरे करण्यात येत आहे. दरम्यान कौस्तुभ आणि कीर्तीच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी त्याचे चाहते देखील तेवढेच उत्सुक असणार आहेत.