गोस्वामी सर मला परत यायची संधी द्या…मनाविरुद्ध महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडणाऱ्या भूषण कडूची हात जोडून विनंती
![bhushan kadu and sachin goswami](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/05/7654353463325436456456.jpg)
अभिनेता भूषण कडू बऱ्याच प्रतीक्षेनंतर मीडियाला मुलाखत देण्यासाठी आला आहे. या मुलाखतीत त्याने गेल्या आठ वर्षातील अनेक कठीण प्रसंगांची आठवण करून दिली आहे. कोविडच्या काळात भूषणने त्याच्या पत्नीला गमावले होते. यामुळे तो अधिकच डिप्रेशनमध्ये गेला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शोत्याला नाईलाजाने सोडावा लागला होता. त्यामुळे त्याला मोठा आर्थिक फटकाही बसला. पण आता पुन्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये येण्याची त्याने इच्छा व्यक्त केली आहे. याबद्दल भूषण सांगतो की, कोविडचा काळ चालू होता त्यावेळी हाताशी काम नसल्याने तो आर्थिक अडचणीत होता. विजय पाटकर यांच्याकडून त्याला काही आर्थिक मदत मिळाली होती, पण काही जवळच्या दोन व्यक्तींकडून भूषणने पैसे घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी भूषण सर्वतोपरी प्रयत्न करत होता. त्यादरम्यान नाटक, चित्रपट तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा अशी त्याची तारेवरची कसरत सुरू होती.
![bhushan kadu request to sachin goswami](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/05/34654734652346564.jpg)
पण या जवळच्याच दोन व्यक्तींनी त्याचा गैरफायदा घेतला. हे दोघेही जण भूषणला त्रास देऊ लागले. पैसे परत मिळवण्यासाठी ते त्याला धमकावू लागले. अर्थात भूषणचा स्वभाव शांत असल्याने त्या लोकांनी त्याचा फायदा घेतला. पैसे मिळवण्यासाठी ते लोक महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवर येऊ लागले, भूषणला धमक्या देऊ लागले, तरीही भूषण काहीही न बोलता महिन्याला त्यांचे पैसे न चुकता देत होता. पण कोविडच्या काळात एक दिवस असा आला की सचिन गोस्वामी यांना कोरोना झाल्याने त्यांना घरीच कोरन्टाइन व्हावे लागले त्यामुळे त्या महिन्याचा पगार मिळण्यास उशीर झाला. भूषणला तीच धाकधूक सतावत होती , कोणी अनोळखी व्यक्ती सेटवर जरी दिसला तर त्याला धडकी भरायची. नाटकाच्या प्रयोगावेळी ही लोकं तिथे येतील म्हणून तो नाटक संपल्यावर लगेचच मागच्या बाजूने निघून जायचा. या धाकधूकमुळे भूषण तीन दिवस नीट जेवला नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रा सेटवर जाण्यासाठी तो निघाला तेव्हा प्रचंड तणावामुळे भूषणला चक्कर आली. जवळच्याच मित्राला त्याने ही गोष्ट फोनवरून कशीतरी कळवली. तेव्हा तो मित्र ताबडतोब तिथे आला भूषणला रिक्षात बसवले आणि डॉक्टरांकडे घेऊन गेला. तेव्हा डॉक्टरांना भूषणच्या प्रकृतीचे गांभीर्य कळले. अजून ताण दिला तर भूषणला ब्रेन हॅमरेज होऊ शकतो असे सांगितले म्हणून मग अशा परिस्थितीत काय करावं हे भूषणला अजिबातच कळत नव्हतं. घरी टेन्शन बद्दल सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल, हास्यजत्रेच्या सेटवर का नाही जाऊ शकत हे देखील तो सांगू शकत नव्हता. अशातच सेटवरच्याच काही लोकांनी भूषण विरोधात कान भरण्यास सुरुवात केली. तो काय आता दारू पिऊन कुठेतरी पडला असेल असे बोलले जाऊ लागले. परिणामी भूषणला नाईलाजाने महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून द्यावी लागली.
![bhushan kadu with son](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/05/4367565346357765.jpg)
मधल्या अनेक डिप्रेशनच्या घटनेत काही चांगली माणसं त्याला भेटली. स्वामींच्या मठातील प्रमुख व्यक्तीने भूषणला योग्य मार्ग दाखवला, सकारात्मक गोष्टी घडत गेल्या तसे भूषण स्वतःला सावरण्यात यशस्वी झाला. नाटकाचे लेखन, मालिकेचे लेखन तो करू लागला. अशाच एका मालिकेच्या निमित्ताने त्याला तिथे जवळच असलेल्या हास्यजत्राच्या सेटवर जाण्याची संधी मिळाली. तेव्हा भूषण सचिन सरांना भेटू कसं? म्हणून प्रश्नांकित होता. पण भेट झाल्यानंतर सचिन सरांनी आता तू काय करतोस याची चौकशी केली, पण मी पुन्हा इथे काम करू का अशी म्हणायची त्याला हिम्मत झाली नाही. पण या मुलाखतीच्या माध्यमातून तो सचिन सरांना पुन्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये घेण्याची विनंती करत आहे. ‘गोस्वामी सर मला परत यायची संधी द्या’ अशी तो त्यांना साद घालत आहे. भूषणची ही इच्छा सचिन गोस्वामी सर पूर्ण करतील का हे आता येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास भूषणने पुन्हा त्याच जोमाने मराठी इंडस्ट्रीत दाखल व्हावे अशी प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केली आहे.