![marathi actor arvind kane](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2023/09/76543214235543364.jpg)
मराठी रंगभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. अरविंद काणे हे प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे हिचे आजोबा होते. अरविंद काणे यांनी १९५३ सालापासून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचे त्यांनी ७५० प्रयोग केले होते. त्यांची पत्नी यादेखील नाट्य अभिनेत्री तर मुलगी म्हणजेच गौतमीची आई देखील अभिनेत्री होत. पत्नी आणि मुलीसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली मात्र आपल्या नातीसोबत काम करता यावे अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छा ‘माझा होशील ना’ या मालिकेने पूर्ण केली होती. अरविंद काणे यांनी झी मराठीच्या माझा होशील ना मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती.
![actor arvind kane](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2023/09/346545785646342543654.jpg)
त्यात त्यांना गौतमीसोबत काम करता आले होते. आपल्या आजोबांच्या निधनाच्या बातमीने गौतमी खूप भावूक झाली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक भावनिक पोस्ट शेअर करताना गौतमी म्हणते की, “प्रिय आजोबा पत्रास कारण कि , आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला ! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळया भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं ….. पण आजोबा काय सांगू तुम्हाला ….इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका ! प्रत्येक भूमिकेच वेगळेपण जपलं तुम्ही … कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं …. सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून …. नंतर आईचा पुनर्विवाह ….नवीन कुटुंबामध्ये प्रवेश …. नवीन भावांचं सक्ख्यानपेक्षा जास्त प्रेम ….तुमच्यासारख्या handsome नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश …..नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम ….लग्न ….. दोन गोड़ मुलांचा जन्म …. सारंच कथानक एखाद्या फिल्म ला लाजवेल असा ….तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा … “एखाद्याचं नशीब” म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात अली …नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले . मग ” याला जीवन ऐसे नाव” म्हणत तुम्ही पुढे गेलात … “अशी पाखरे येति” म्हणत संसार सुरु झाला …. “नाटककराच्या शोधात तुम्ही सहा पात्र” फिरत गेलात ….पुढे “शेहेनशाह” बनून तुम्ही “नटसम्राट” असल्याचा दाखवून दिलंत
![actor arvind kane with gautami](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2023/09/74632143235366545.jpg)
दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं “तो मी नव्हेच ” म्हणत राहीलात असे आयुष्याचे खरे खुरे “किमयागार ” ठरलात “चाणक्य ” बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात …. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही. प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो … यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय …. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारोत आयुष्यभर ….तुम्ही आता मात्र शांत व्हा ….दमला असाल तुम्ही …. आता खऱ्या अर्थानी पडदा पडला आहे …नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे ….तुमच्यातला हा ‘नट ” आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू …. अन तुमच्या 10% तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू ….तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य ….झालेत बहू ,असतील बहू , होतील बहू ,पण या सम हा ….!! रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते….अन त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते ….तुमची नात आणि तुमची फॅन गौतमी .”