सचिन गोस्वामींना मी ते सांगितलं तेव्हा तेच मला म्हणाले की… गौरव मोरेने प्रथमच सांगितलं हास्यजत्रा सोडण्याचं कारण
![gaurav more sachin goswami latest news](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/06/765434254364564.jpg)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेक कलाकार घडवले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या शोला गळती लागल्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शवण्यास सुरुवात केली आहे. विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, ओंकार भोजने यासारखे कलाकार तर हास्यजत्रा सोडूनच गेले पण गौरव मोरेने देखील हास्यजत्रा सोडावी हे अजूनही प्रेक्षकांना रुचलेले नाही. मॅडनेस मचाएंगेच्या मंचावर फिल्टर पाड्याचा हा बच्चन प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे. पण तिथेही त्याच्यावर टीका करण्यात येऊ लागली आहे. तिथे तू स्वतःचं हसू करून घेतोएस अशी प्रतिक्रिया त्याला मिळत आहे.
![gaurav more with johney leaver in hasyajatra](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/06/765435254365475.jpg)
पण हे प्रेक्षकांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे, म्हणून ते मला असं बोलतात असे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौरव स्पष्टीकरण देताना दिसतो. याच मुलाखतीत गौरव मोरेने हास्यजत्रा सोडण्याचे कारण सांगितले आहे. हास्यजत्रा का सोडली यावर गौरव म्हणतो की, ‘तोचतोच पणा येत होता. मी गेली ५ वर्ष हास्यजत्रेत काम करत होतो. मी काही स्किट केलं की त्यावर अगोदरच गृहीत केलं जायचं. त्यामुळे मला त्यात मजा वाटत नव्हती. मी सगळ्यांशी हे बोललो सुद्धा, सचिन गोस्वामी यांनाही मी ते सांगितलं तेव्हा तेच मला म्हणाले की, तू ब्रेक घे. पण मला वेगळं करायचं होतं तोचतोचपणा वाटल्याने मी हास्यजत्रा सोडतो असा ठाम निर्णय त्यांना सांगितला.
![gaurav more and sachin goswami photos](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/06/7654325436346756.jpg)
सचिन सर आणि माझ्यात खूप चांगले संबंध आहेत. ते काहीच बोलत नाहीत जर काही वाईट बोललेच तरी मला त्याचं वाईट वाटणार नाही कारण मलाच त्यांनी मोठं केलं आहे , ते मला वडिलांसारखेच आहेत. उलट या शोमुळे माझं नाव झालं मी ते कधीही विसरणार नाही. हास्यजत्रा फेम गौरव मोरे असं माझ्या नावापुढे लावलं जातं ही ओळख मला त्यांनी दिली आहे. सगळ्या कलाकारांसोबत माझे छान संबंध आहेत.”