तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचा प्रचंड मोठा असा चाहतावर्ग आहे. त्यामुळे हिंदी मालिकांमध्ये ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये कायम अग्रेसर असलेली पाहायला मिळाली आहे. २००८ सालापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत बरेचसे नवे कलाकार दाखल झाले असले तरी जुन्या कलाकारांनी देखील आपले स्थान प्रेक्षकांच्या मनात पक्के केले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या मालिकेत एक चूक घडली असल्याचे जाणकार प्रेक्षकांच्या निदर्शनास आले आहे. या चुकीमुळे मालिकेच्या टीमला आता धारेवर धरण्यात येऊ लागले आहे.

सोशल मीडियावर होत असलेली ही टीका पाहून आता या संपूर्ण टीमने प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या सोमवारच्या भागात गोकुळधाम सोसायटीचे सदस्य क्लबमध्ये एकत्र जमलेले असतात. तिथेच जुनी गाणी ऐकायला मिळाल्याने या सदस्यांमध्ये चर्चा चाललेली असते. तेवढ्या लता दीदींनी स्वरबद्ध केलेलं ए मेरे वतन के लोगों ..हे गाणं तिथे ऐकायला मिळतं आत्माराम भिडे या गाण्याची आठवण सांगताना म्हणतात की , हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालं होतं त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मात्र जाणकार प्रेक्षकांनी या गाण्याची प्रदर्शनाची तारीख चुकीची सांगितली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. यावरून मालिकेवर प्रचंड प्रमाणात टीका देखील करण्यात येऊ लागली आहे.

मुळात लता दीदींनी हे गाणं २६ जानेवारी १९६३ रोजी गायलं होतं. आपल्याकडून ही चूक झाली असल्याचे लक्षात येताच मालिकेच्या टीमने प्रेक्षकांची जाहीरपणे माफी मागण्याचा निर्णय घेतला. असित मोदी आणि मालिकेच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यात लिहिले आहे की, आम्ही आमचे हितचिंतक आणि तमाम जनतेची माफी मागतो. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही ए मेरे वतन के लोगों हे गाणं १९६५ साली प्रदर्शित झालं असल्याचे म्हटलो होतो पण हे गाणं २६ जानेवारी १९६३ रोजी प्रदर्शित झालं होतं. आम्ही आमची चूक मान्य करतो पुन्हा अशी चूक होणार नाही याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ.