
शूटिंग करत असताना कलाकारांना काही ना काही दुखापत होते. ही घटना जर दैनंदिन मालिकेच्या बाबतीत घडली आणि दुखापत जर मुख्य नायिकेलाच झाली तर मालिकेच्या कथेतही बदल करावे लागतात. सध्या असाच काहीसा ट्रॅक सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेतील नायिका म्हणजेच लतिकाची भूमिका करणाऱ्या अक्षया नाईकला सेटवर अपघात झाल्याने ती व्हिलचेअवर बसली आहे. अक्षयानेच तिच्या इन्स्टा पेजवर ही माहिती शेअर करत सध्या मी आराम करत आहे अशा शब्दात संवाद साधला आहे. तिला नक्की काय झालाय तेदेखील तिने सविस्तरपणे मांडलेलं पाहायला मिळत आहे.

मुलींच्या सौंदर्याची व्याख्या म्हणजे ती गोरी असावी, बारीक असावी अशी अनेकजण करतात. मुली वजनाने जाड असतील तर त्यांना समाजात अनेक टोमणे सहन करावे लागतात. मात्र मुलींचं सौंदर्य हे त्यांच्या वर्ण कसा आहे, त्या स्थूल आहेत की बारीक यावर ठरत नाही तर आयुष्यात येणारी संकटं, परिस्थिती यांना त्या कशाप्रकारे तोंड देतात यावर त्यांचं सौंदर्य असतं. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील नायिका लतिका हिने हाच संदेश समाजाला दिला आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी खूप गाजत आहे. व्यायाम आणि फिटनेसची आवड असलेला अभिमन्यू आणि वजनाने जाड असलेली लतिका यांचं लग्न अभिच्या मनाविरूध्द होतं पण नंतर त्यांच्यात कसं प्रेम फुलतं याचीही कथा आहे. सध्या ही मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे. नाशिक परिसरात या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. शूटिंग करत असतानाच अक्षया नाईकला अपघात झाला. तिच्या गुडघ्याला दुखापत झाली असून (लिगामेंट टिअर) पुढचे काही दिवस तिला चालता येणार नाही.

अक्षयाने व्हिलचेअरवर बसून सेटवर फेऱ्या मारत असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिनं असं लिहिलं आहे की, मला दुखापत झाल्याने मी व्हिलचेअरवर आहे. लिगामेंटलाच दुखापत झाल्याने मला काही दिवस उभं राहता येणार नाही. त्यामुळे या मालिकेच्या कथानकात काही बदल करण्यात आले आहेत. मालिकेच्या पुढील काही भागात मी विश्रांती घेताना दिसणार आहे. सध्या मला आरामाची गरज असून तसा उल्लेख मालिकेत दाखवण्यासाठी ऑफस्क्रिन टीमने मला सहकार्य केलं त्याबददल त्यांचे आभार. सध्या तरी अक्षया पूर्ण आराम करत आहे. यापूर्वीही अनेक मालिकांमधील मुख्य कलाकारांनाच अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही कलाकारांची मालिकेतून तात्पुरती एक्झिट दाखवली होती, तर काही कलाकारांना मालिकेच्या कथेतही अपघात झाल्याचे दाखवण्यात आले होते. आता प्रेक्षकांनाही याची सवय झाली असून प्रेक्षक समजून घेत असल्याचं दिसून येतं.