स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काही दिवसांपूर्वीच जयदीप आणि गौरी दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले. कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत देखील अभिमन्यू आणि लतिकाचा पुनर्विवाह झाला तर लवकरच ओम आणि स्वीटूच्या लग्नाचाही बार उडणार आहे. त्यामुळे आता सर्व टीव्ही मालिकेत सध्या लग्नसोहळे ट्रेंडमध्ये असलेले पाहायला मिळताहेत. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप आणि गौरीच्या लग्नानंतर एक ट्विस्ट आणला आहे.

जयदीप आणि गौरी यांच्या नात्यात जवळीक वाढू लागली असतानाच आता आणखी एक विघ्न त्यांच्या नात्याच्या आड येणार असल्याचे समोर आले आहे. जयदीपची बालपणीची मैत्रीण म्हणजेच मनु या मालिकेत एन्ट्री घेत आहे. मनू आणि आई जयदीपच्या घरी दाखल झाले आहेत आणि माईला त्या मनूची ओळख करून देत आहेत. नुकत्याच मालिकेच्या या प्रोमोत मनू ही जयदीपची बालपणीची मैत्रीण आहे आणि या दोघांनाही एकमेकांशिवाय करमायच नाही असं प्रोमोत पाहायला मिळतंय..त्यामुळे गौरी आणि जयदीपच्या नात्यात मनुमुळे आता फूट कशी पडणार हे दाखवले जाणार आहे. यात मनूला देवकीची साथ कशी मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे. मालिकेत मनूची भूमिका साकारली आहे अभिनेत्री अश्विनी कासार हिने. अश्विनी कासार हिच्या आईची भूमिका अभिनेत्री अंजली वळसांगकर यांनी निभावली आहे. अश्विनी कासार हिने कलर्स मराठीवरील कमला या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. अश्विनीने साकारलेली कमला प्रसिद्धी मिळवताना दिसली होती. कट्टी बट्टी, मोलकरीण बाई, सावित्री ज्योती या मालिकेत ती महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती.

अश्विनी कासार हिने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण आणि त्यानंतर अश्विनीने वकिलीचे शिक्षण घेतले. आदर्श विद्यामंदिर शाळेत असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी दर्शवला होता. पुढे कॉलेजमध्ये असताना विविध नाटकांमधून काम करता आले. कमला या मालिकेमुळे अश्विनीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तर सावित्री ज्योती मालिकेत तिने साकारलेली सावित्रीबाईंची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. मात्र टीआरपी न मिळाल्याने ही मालिका अर्ध्यावरच बंद पडली होती. मराठी ऍक्टर्स राउंड टेबल या नावाने सिरीज बनवण्यात आली आहे त्यात अश्विनी कासार महत्वाच्या भूमिकेत झळकली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून ती मनुची भूमिका निभावणार आहे या भूमिकेबाबत अश्विनी खूपच उत्सुक आहे कारण मनूच्या एन्ट्रीमुळे जयदीप आणि गौरीच्या नात्यात फूट पडणार आहे. या नव्या मालिकेसाठी आणि त्यातील मनूच्या भूमिकेसाठी अश्विनी कासार हिचे अभिनंदन.