साऊथचा सुपरस्टार म्हणून सर्वपरिचित असेलला अभिनेता सिद्धार्थ मेनन सध्या त्याच्या नव्या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सिद्धार्थ मेनन हा मूळचा केरळचा. आजवर मल्याळम चित्रपटातून त्याने मुख्य भूमिका साकारल्या आहेत शिवाय अनेक दाक्षिणात्य अल्बम आणि चित्रपटातील गाणी देखील त्याने गायली आहेत. सिजू जवाहर दिग्दर्शित ‘kadha paranja kadha’ या दाक्षिणात्य चित्रपटातून सिद्धार्थ मुख्य भूमिकेत झळकत आहे. हा चित्रपट २०१८ साली थेटर मध्ये रिलीज करण्यात आला होता मात्र आता डिजिटल प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवरून हा चित्रपट परदेशात रिलीज केला जात आहे.

आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी ही मोठी आनंदाची बातमी असल्याचे सिद्धार्थ या चित्रपटाबाबत सांगतो. या चित्रपटाअगोदर सिध्दार्थने कल्यानम, सोलो, वेगम, वेलकम होम, रॉकस्टार या मल्याळम चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रत्येक चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी नावाजले होते. Thaikkudam bridge या नावाने त्याचे स्वतःचे म्युजिक बँड आहे. अनेक इव्हेंटमध्ये तो गाणी देखील सादर करताना दिसतो. अनेकांना हे माहित नसेल कि त्याची पत्नी देखील मराठी अभिनेत्री आहे. २०१९ साली मराठमोळी अभिनेत्री तन्वी पालव दाक्षिणात्य अभिनेता आणि गायक ‘सिद्धार्थ मेनन’ सोबत विवाहबद्ध झाली. सिद्धार्थ आणि तन्वी दोघांची लग्नाआधी ओळख होती. या ओळखीचे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. तन्वी सध्या कुठल्याच मालिकेतून सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमी आपल्या डान्सचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अनेक ठिकाणी दोघे फिरायला गेल्याचे फोटो देखील ती अपलोड करताना दिसते.

मराठमोळी अभिनेत्री तन्वी पालव हिने अनेक मराठी हिंदी मालिका अभिनित केल्या आहेत. वयाच्या १० व्या वर्षी दूरदर्शनवरील स्वराज या हिंदी मालिकेत तिने बालकलाकाराचे काम केले होते. बालपणापासून नृत्याची विशेष आवड असलेल्या तन्वीने वयाच्या १० व्या वर्षीच ‘बालश्री’ पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे शाळेत तिला नेहमी शिक्षकांचा पाठिंबा असायचा. रुईया कॉलेजमधून तिने अर्थशास्त्र विषयाची पदवी प्राप्त केली होती त्यासोबतच नालंदा महाविद्यालयातून परफॉर्मिंग आर्ट मधून पदव्युत्तर शिक्षण तीन घेतले आहे. कॉलेजमध्ये जेवढ्या नृत्यस्पर्धा व्हायच्या त्यात ती नेहमी सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब करायची. त्यामुळे नृत्यात विशेष निपुण असलेल्या तन्वीने विविध मंचावरून नृत्याची झलक दाखवून दिली होती. कॉलेजमध्ये असताना नाट्यवलयशी जोडली गेल्याने अनेक नाटकातून अभिनयाची तिला संधी मिळाली. नाटक आणि नृत्य याची सांगड घालत असताना पुढे जावई विकत घेणे आहे, शुभंकरोती , मन उधाण वाऱ्याचे मालिकेतून ती मुख्य भूमीकेत पाहायला मिळाली.