काही दिवसांपूर्वीच सैराट चित्रपट फेम सल्या म्हणजेच अरबाज शेख याने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. पुण्यातील एका रिक्षाचालकाचा पाठमोरा फोटो आणि रिक्षाचा नंबर पोस्ट करून या रिक्षाचालकाने मनस्ताप दिला असल्याचे सांगितले होते. १९८ रुपये झाले असताना ६० रुपये अधिकचे घेतल्याचा आणि अरेरावी करत शिवीगाळ केल्याचा आरोप अरबाजने या रिक्षाचालकावर लावला होता. त्याची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती त्यावरून त्या रिक्षाचालकावर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. आता हा रिक्षा चालक आसिफ मुल्ला अरबाजच्या पोस्टमुळे चांगलाच वैतागला आहे.

अरबाजच्या पोस्टमुळे मला बाहेर देखील पडणे आता कठीण झाले आहे असे तो रिक्षाचालक म्हणत आहे. नुकतीच मीडियाशी बोलताना त्या रिक्षाचालकाने स्पष्टीकरण दिले आहे की, अरबाजने धायरी फाट्याजवळ रिक्षा बुक केली होती. तिथून त्याला पुण्यात जाऊन ट्रेन पकडायची होती. त्यासाठी १९८ रुपये आकारण्यात येणार होते. मॅपच्या अंदाजाने रिक्षा भिडे पुलाजवळ आली मात्र पुलावर नदीचे पाणी वाढले होते त्यामुळे पोलिसांनी तो रस्ता बंद केला होता. काही जण तरीही रिस्क घेऊन तो पूल ओलांडत होते. अरबाजने ६ वाजताची ट्रेन आहे असे म्हटल्यावर मला भिडे पुलावरून रिक्षा घ्यायला लावली मात्र पाणी खूप वाढल्याने मला ती रिक्षा पाण्यात न्यायची नव्हती. समोर एवढं मोठं संकट उभ असताना मी ती रिक्षा कशी पाण्यात नेणार होतो?. त्यावरून तुम्ही इथून जाऊ शकता फक्त एवढंच त्याला म्हटलं, मी अरबाजला खाली उतर असं कधीच म्हटलं नव्हतं. जर स्टेशनपर्यंत जायचं असेल तर आपल्याला मार्ग बदलावा लागलं पण त्याबदल्यात तुम्हाला पैसे वाढवून द्यावे लागतील असं म्हटलं. मग रिक्षा आप्पा बाळवंत चौकातून कुंभरवाड्यातून स्टेनशनवर नेली. त्यांनी मला पैसे पे केले आणि निघून गेले.

मी त्यांना शिवी वगैरे काहीच दिली नव्हती त्यांनी हा खोटा आरोप माझ्यावर लावला आहे. माझी आजपर्यंत कंपनीकडे तक्रार गेलेली नाही. फक्त नदीचं पाणी वाढल्यामुळे मी रिक्षा आत न्यायला नकार दिला होता. अरबाजच्या मोत्रणेच रिक्षा बुक केली होती. त्यावेळी अरबाजच्या तोंडावर मास्क होता त्यामुळे मी त्याला ओळखलं पण नाही. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर त्यांना मी स्टेशनला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अरबाजच्या पोस्टनंतर मला सगळ्यांचे फोन यायला लागले. माझ्या घरी देखील वातावरण खूप टेन्शन मध्ये होतं. मला बाहेर पडायला देखील आता कठीण झालं आहे. मी असिफ मुल्ला अरबाजला एवढंच म्हणतो की त्यांना मी शिवी दिलेली नाही जर दिली असती तर मी तुम्हाला सॉरी नक्कीच म्हटलो असतो हा तुम्ही माझ्यावर खोटा आरोप केला आहे. ‘