आपल्या स्वप्नातलं घर खरेदी करण्याची ईच्छा सर्वांनाच असते. असेच स्वप्न उराशी बाळगून असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने नुकताच या घरात गृहप्रवेश केलेला पाहायला मिळतो आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवताना दिसला होता. नुकताच पावनखिंड या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पार पडला त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. बाजीप्रभूंनी आपल्या जीवाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे पाठवले. चित्रपटात ही ऐतिहासिक भूमिका अजय पुरकर यांनी निभावली होती. त्यांच्या या भूमिकेचे सर्वांनीच मोठे कौतुक केलेले पाहायला मिळाले.

ज्या मातीत इतिहास घडला त्याच मातीत आपलं एक छानसं घर असावं असे स्वप्न अजय पूरकर यांनी पाहिले होते. त्यांचं हेच स्वप्न आता सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी अजय पुरकर यांनी एक छोटंसं पण तितकच दिमाखदार घर बांधलं आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १९ जून रोजी त्यांनी आपल्या या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याच दिवशी प्रवाह पिक्चर वाहिनीवर पावनखिंड या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होता. ‘योग्य जुळून आलाय, उत्तम मुहूर्तावर दोन्ही गोष्टी घडल्या, महादेवाचा आशीर्वाद असे म्हणत अजय पुरकर यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्या भूमिकेने आपल्याला एक नवी ओळख मिळवून दिली आज त्यांच्याच सहवासात राहायला मिळाल्याचे भाग्य दुसरे काय असू शकते हीच भावना त्यांच्या मनात आहे. अजय पुरकर हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. असंभव, तू तिथे मी, मुलगी झाली हो, अस्मिता , बालगंधर्व, फर्जंद, पावनखिंड अशा चित्रपट, मालिका तसेच नाटकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

पावनखिंड चित्रपटातील बाजीप्रभूंच्या भूमिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली ही भूमिका त्यांनी केवळ साकारली नाही तर ते ही भूमिका जगले अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. एका मुलाखतीत त्यांना या भूमिकेबाबत विचारले त्यावेळी ते म्हणाले होते की, या भूमिकेमुळे मला छोट्या मित्रांकडून भरभरून प्रेम मिळालं, अनेकजण आवर्जून माझ्यासाठी भेटवस्तू देखील आणतात अशी अजय पुरकर यांनी आठवण सांगितली होती. त्यावेळी एक किस्सा सांगिताना म्हणाले होते की, एका मुलाचे पालक त्यांच्या जवळ येऊन म्हणाले की आमचा मुलगा रात्री झोपेतून उठून रडू लागला आणि म्हणाला ‘बाजीप्रभू एकटेच उभे राहून रडत आहेत मला तिकडे घेऊन चला’. प्रेक्षकांचंच नव्हे तर छोट्या मित्रांचं हे प्रेम पाहून खरंच खूप भारावून जायला होतं.