
मराठी चित्रपट सृष्टीत सुरवातीच्या काळात अभिनेत्यांना फार महत्व होत अभिनेता चांगला तर चित्रपट पाहायला लोकांची गर्दी व्हायची. पण त्याकाळातही अश्या काही अभिनेत्री होत्या ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमठवला. त्या दिसायला अगदी सुंदर तर होत्याच पण त्याचसोबत त्यांच्या अभिनय तितकाच दांडगा होता. मराठी सृष्टीतील एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री आज वृद्धापकाळामुळे अभिनय क्षेत्रापासून दूर असलेल्या पाहायला मिळतात त्यातील काही खास ६ अभिनेत्रींबद्दल आज जाणून घेणार आहोत…

१. सुलोचना लाटकर- चित्रपट सृष्टीचा दीर्घकाळ अनुभवलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सुलोचना लाटकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेली सोज्वळ आणि निरागस आई म्हणून त्यांची ओळख आहे. नुकतेच ३० जुलै रोजी त्यांनी आपल्या वयाच्या ९४ व्या वर्षात पदार्पण केले होते. हिंदी मराठी अशा जवळपास ३०० चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे अनेक नामवंत कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. सासू वरचढ जावई, अंदर बाहर, मोलकरीण, मजबूर, कहाणी किस्मत की, साधी माणसं, सांगते ऐका, दिलं देके देखो , सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून नायिकेच्या, सहाय्यक आणि आईच्या भूमिका साकारल्या. आज अभिनयापासून त्या दूर असल्या तरी अनेक कलाकार त्यांच्या घरी त्यांना भेटायला जातात.
२. चित्रा नवाथे – चित्रा नवाथे या पूर्वाश्रमीच्या कुसुम सुखटणकर होय. मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत सुखटणकर कुटुंब राहत होते. चार बहिणी, दोन भाऊ, आईवडील असा चित्रा म्हणजे कुसुम यांचा लग्नापूर्वीचा परिवार. पन्नासच्या दशकात अनेक सिनेमात झळकलेल्या अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. नातेवाईक असूनही चित्रा नवाथे यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली होती. मुलूंडमधील वृद्धाश्रमात असल्याची माहिती एका वृत्त माध्यमातून व्हायरल झाली होती. चित्रा यांना स्मृतिभ्रंश झाला असल्याचे त्या वृत्तात सांगितले होते. चित्रा यांनी लाखाची गोष्ट, वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, बोलवता धनी, टिंग्या, अगडबम, बोक्या सातबंडे अशा मालिका आणि सिनेमात काम केलं आहे.
३. रेखा कामत- रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या दोघींनी लाखाची गोष्ट या चित्रपटात एकत्रित काम केले होते. रेखा कामत या पूर्वाश्रमीच्या कुमुद सुखटणकर होय. चित्रपट लेखक ग रा कामत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, लग्नाची बेडी, ऋणानुबंध, अग्गबाई अरेच्चा! या चित्रपट, नाटक आणि मालिकेतून त्यांनी अभिनय साकारला होता. खूप वर्षांपूर्वी त्यानी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती.

४. संध्या शांताराम- संध्या शांताराम यांचा मुख्य भूमिका असलेला पिंजरा हा मराठी चित्रपट खूपच गाजला होता. त्यातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी देखील आजही तितकीच लोकप्रिय असलेली पाहायला मिळतात. अमर भूपाळी, परछायी, स्त्री, नवरंग, लडकी सह्याद्री की, दो आखें बारा हाथ अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. येत्या २७ सप्टेंबर रोजी त्या ८४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या अभिनयापासून दूर असलेल्या पाहायला मिळतात.

५. वत्सला देशमुख- वत्सला देशमुख या संध्या शांताराम यांची थोरली बहीण आहे. दोघी बहिणी सुरुवातीला गाण्यांवर नृत्य सादर करत असत. इथूनच त्यांना नाटक आणि चित्रपटात अभिनयाची संधी मिळत गेली. झंजार, झुंज, लडकी सह्याद्री की, पिंजरा, विधिलिखित, नवरंग अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दिवंगत अभिनेत्री ‘रंजना’ ही त्यांची मुलगी होय. वत्सला देशमुख या वयाच्या नव्वदीत पोहोचल्या आहेत. काही वर्षांपासून त्या त्यांची बहीण संध्या यांच्याकडे राहत असल्याचे वृत्त माध्यमातून सांगितले जात होते.

६. दया डोंगरे- “दया डोंगरे” हे मराठी तसेच हिंदी सृष्टीतील एक गाजलेलं नाव. त्यांनी बहुतेक वेळा विरोधी ढंगाच्याच भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. खाष्ट आणि कजाग सासू साकारून त्यांनी अनेक मराठी चित्रपट आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवले होते. त्यांच्या आई यामुताई मोडक या हौशी नाट्यअभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘ लेकुरे उदंड झाली’, ‘उंबरठा’, ‘दौलत की जंग’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा चित्रपट नाटकातून त्या प्रेक्षकांसमोर आल्या. दया डोंगरे यांनी काही वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यांना दोन विवाहित कन्या असून मोठी मुलगी संगीता ही मुंबईत त्यांच्या घराजवळ राहते तर धाकटी अमृता बंगलोर येथे असते. कन्या, जावई आणि नातवंडे अधूनमधून येऊन-जाऊन असतात. त्यांचे पती शरद डोंगरे यांचे 2014 मध्ये आकस्मिक निधन झाले. त्या दु:खातून त्यांनी स्वत:ला सावरले आहे. नाटकाची भयंकर आवड असलेल्या दया डोंगरे यांनी अश्रूंची झाली फुले या नाटकाला उपस्थिती दर्शवली होती.