मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. वत्सला देशमुख या मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना यांच्या आई तर ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांच्या बहीण होत. वत्सला देशमुख यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ‘ललितकलादर्श’ कंपनीत कार्यरत होते. कंपनीच्या नाटकातून लहान-मोठय़ा भूमिका ते करत असत. नाटक कंपनी फिरती असल्याने आई-वडिलांबरोबर त्यांच्या मुलाचे आणि वत्सला व संध्या या दोन मुलीसोबत ठिकठिकाणी दौरे व्हायचे.

इथूनच दोघी बहिणींना नाटकातून काम करण्याची संधी मिळाली. हिंदी चित्रपट ‘तुफान और दिया’, ‘नवरंग’, ‘ ‘लडकी सह्य़ाद्री की’, ‘हिरा और पथ्थर’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. ‘वारणेचा वाघ’, ‘पिंजरा’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘झुंज’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या. वत्सला देशमुख आणि संध्या यांनी बहुतेक चित्रपटातून एकत्रित काम केलं आहे. संध्या आणि वत्सला यांनी व्ही शांताराम यांच्या चित्रपटातून काम केलेले पाहायला मिळते. चित्रपटात काम करत असतानाच व्ही शांताराम यांनी संध्या सोबत विवाह केला होता.पिंजरा या चित्रपटात दोघी बहिणी एकत्रित झळकल्या यात वत्सला देशमुख यांनी आक्काची भूमिका साकारली होती. वत्सला देशमुख यांना तीन अपत्ये. त्यांची दोन मुले मोठा मुलगा नरेंद्र वयाच्या पन्नासाव्या वर्षी तर धाकटा मुलगा श्रीकांत वयाच्या तिसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले होते.

तर रंजना देशमुख यांचे २००० साली निधन झाले. रंजनाजींच्या निधनानंतर वत्सला देशमुख पूर्णपणे खचून गेल्या होत्या. १९८७ साली झुंजार चित्रपटाच्या निमित्ताने प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातानंतर हालचाल होत नसल्याने त्यांनी चित्रपटात काम करणेच सोडून दिले होते. रंजनाची अशी अवस्था वत्सला देशमुख यांना पाहवत नव्हती. अशा परिस्थिती त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत खंबीर राहून आपले जीवन व्यतीत केलेले पाहायला मिळाले. वत्सला देशमुख यांच्या जाण्याने मराठी हिंदी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना आमच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली…