स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करणे समाजात अपवित्र मानले जाते. ही गोष्ट पूर्वापार चालत आलेली असली तरी आजच्या पिढीने या गोष्टीला बगल दिलेला पाहायला मिळतो आहे. देऊळ बंद चित्रपटातली गश्मीर महाजनीची मुलगी तुम्हाला आठवत असेल. आर्या घारे हिने ही भूमिका साकारली होती. भिरकीट, अ.ब.क., बॅक टू स्कुल, पोश्टर गर्ल अशा चित्रपटातून आर्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. बालकलाकार म्हणून आर्याने मराठी सृष्टीत पाऊल टाकलं. वेगवेगळ्या चित्रपट आणि शॉर्टफिल्मच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहीली . काल मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी आर्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

समाजाला काहीतरी प्रेरणा मिळेल या हेतूने तिची आई वैशाली घारे या आर्याचा वाढदिवस नेहमी हटके अंदाजात साजरा करत असतात. गेल्या वर्षी देखील आर्याच्या वाढदिवशी तिने तिच्या चाहत्यांकडून बिया मागवल्या होत्या. या गोळा झालेल्या बिया तिने सयाजी शिंदे यांच्या मदतीने आणि मित्रांच्या मदतीने पुण्याच्या आसपासच्या माळरानावर आणि डोंगरावर रुजवल्या होत्या. जेणेकरून आपल्या हातून वृक्षारोपणाचे कार्य घडेल. याही वर्षी आर्याने अशाच काहीशा हटके अंदाजात आपला वाढदिवस साजरा केला आहे. स्मशानभूमी म्हटले की अपशकुन मानला जातो. परंतु या अंधश्रद्धा रूढी, परंपरा दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. याच हेतूने लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आर्याने तिचा वाढदिवस पिंपरी चिंचवड येथील स्मशानभूमीत जाऊन साजरा केला. यावेळी आर्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी देखील उपस्थिती लावली होती. याची कल्पना आर्याच्या आईलाच सुचली असल्याचे सांगितले जाते. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा होत असल्याने आर्याने आपल्या आईबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. अंधश्रद्धेला बगल देत या उपक्रमातून नवीन विचार समाजापुढे आणले जातील असा विचार करूनच आर्याच्या आईने हा उपक्रम राबविला आहे.

समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला जावा.जेणेकरून समाजात पसरलेली अंधश्रद्धा कुठेतरी बंद झाली पाहिजे. काही दिवसांपूर्वी नागपुरात अशीच एक घटना घडली. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुरडीला अंधश्रद्धेपोटी आपला जीव गमवावा लागला होता.ही घटना मन सुन्न करणारी होती. याच पार्श्वभूमीवर तरुणांनी आशा अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा असू नये असे आर्या यावेळी म्हणाली. श्रीमंत व्यक्ती असो किंवा गरीब सर्वांचा शेवट हा इथेच होत असतो. स्मशानभूमी हेच अंतिम सत्य असताना ती अपवित्र कशी? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. देहाला मुक्ती मिळते ती ती स्मशानभूमीतच मग इथे वाढदिवस साजरा केल्याने तो अपवित्र कसा ठरेल. म्हणून या गोष्टीला तडा देण्यासाठी मी माझा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्याचे ठरवले असे तीने स्पष्टीकरण दिले आहे.