मालिकेच्या निमित्ताने कलाकार एकत्र येतात, दिवसातील १२ ते १६ तास सेटवर एकत्र असतात. कलाकारांच्या बोलण्यात नेहमी एक वाक्य असतं की मालिकेतील कुटुंब हे आमचं दुसरं घरच असतं. सेटवर कधी कधी खास पदार्थ बनवला जातो, कुणीतरी घरातून डिश बनवून आणतं. मालिकेत दाखवण्यात येणारे सणसमारंभांचे एपिसोड शूट होत असताना तो सण सेटवर जणू कुटुंब म्हणूनच साजरा करण्याचा अनुभव कलाकार घेत असतात. थोडक्यात काय तर मालिकेतील कलाकारांची एक फॅमिलीच बनते. मग जेव्हा ती मालिका निरोपाच्या उंबरठ्यावर येते तेव्हा कलाकारांचं भावुक होणं स्वाभाविकच आहे ना. असाचा भावुक क्षण मन उडूउडू झालं या मालिकेचं पॅकअप होताना कलाकारांनी अनुभवला. शेवटच्या सीननंतर कलाकारांनी सेंडऑफ पार्टी करून एकमेकांना निरोप दिला. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इंद्रजित साळगावकर म्हणजेच इंद्रा आणि दीपिका देशपांडे म्हणजेच दीपू यांच्या प्रेमाची कथा असलेल्या मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात बाजी मारली होती. अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे या जोडीच्या तर प्रेक्षक प्रेमातच पडले होते. इंद्रा आणि दीपू यांच्याबरोबरच सत्तू, देशपांडे सर, मालती काकू, शलाका, जयश्रीकाकू ,सानिका, कार्तिक, मुक्ता, बाबूकाका, मॅनेजर सर, कानविंदे काकू, नयन ही सगळीच पात्रं प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. मात्र काही दिवसांपूर्वी ही मालिका निरोप घेणार असल्याची बातमी समोर आली आणि प्रेक्षकांची निराशा झाली. खरंतर ही मालिका टीआरपीमध्ये चांगल्या स्थानावर असूनही बंद का होतेय हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात रूंजी घालत होता. हृता लवकरच अनन्या आणि टाइमपास ३ या सिनेमात झळकणार आहे. तर अजिंक्यदेखील टकाटक या सिनेमात दिसणार आहे. तसेच अन्य कलाकारांच्याही हातात काही अन्य प्रोजेक्ट असल्याने कलाकारांना या मालिकेसाठी वेळ देणं शक्य होत नसल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील इंद्रा आणि दीपू यांच्या प्रेमाला देशपांडे सर विरोध करत असल्याचा ट्रॅक सुरू होता. त्यामुळे मालिका रंजक वळणावर आली होती.

आता ही मालिका महिनाभरात संपणार असल्याने देशपांडे सरांचा विरोध मावळून दीपू आणि इंद्राच्या लग्नाचा ट्रॅक रंगणार आहे. त्याची तयारी सेटवर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बँकेतील शेवटचा सीन शूट झाला तेव्हाही अजिंक्यने व्हिडिओ करून भावुक होत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर देशपांडे यांच्या घरातील शेवटच्या सीनच शूट झालं. सध्या इंद्रा दीपूच्या लग्नाचे सीन शूट होत आहेत. आता मालिका संपणार असल्याने सगळेच कलाकार दुरावणार आहेत. त्यामुळेच या कलाकारांनी सेंडऑफ पार्टी करत एकमेकांना निरोप दिला. यावेळी अजिंक्य राऊत, हृता दुर्गुळे यांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले. तसेच सानिका, शलाका यांचेही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या पार्टीच्या निमित्ताने कलाकारांनी गेल्या वर्षभरातील सेटवरील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच खूप धमालही केली. मालिका संपली तरी सेटवर शूटिंगच्या निमित्ताने केलेली मजा नेहमीच लक्षात राहील असं म्हणत कलाकारांनी बाय बाय केलं.