मराठी सृष्टीतील नाट्य, मालिका तसेच चित्रपट अभिनेते गिरीश परदेशी यांच्या वडिलांचे शुक्रवारी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुःखद निधन झाले आहे. गिरीश परदेशी यांना अनेक चित्रपटातुन मुख्य नायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. फॉरेनची पाटलीन या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका निभावली होती. त्यांचा हा चित्रपट खूपच चर्चेत राहिला होता. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘या सुखांनो या’ या मालिकेत देखील गिरीश परदेशी एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.

आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी सांगून त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये गिरीश परदेशी म्हणतात की, ‘२६ नोव्हेंबर २०२१ रोजी माझे वडील अनंत प्रवासास निघून गेले. अत्यंत आदर्श ,समाधानी व परिपूर्ण आयुष्य ते जगले ! आमच्या प्रत्येक वाटचालीत पावलोपावली त्यांचा आधार , मार्गदर्शन व प्रेम होते, राहील!’ संगीत सौभद्र, तोच परत आलाय अशी अनेक नाटकं गिरीश परदेशी यांनी आपल्या अभिनयाने गाजवली आहेत. सुरुवातीला पुण्यात थेटर करत असताना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. १९९८ साली नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. यातूनच हिंदी तसेच मराठी नाट्य सृष्टीशी जवळून ओळख झाली. एवढेच नाही तर रशिया, इंग्लंड, पोलंड, अमेरिका यासारख्या देशातून आलेल्या दिग्दर्शकांसोबत त्यांना काम करता आलं. पुढे ‘कोरा कागज’ या हिंदी मालिकेतून त्यांचे छोट्या पडद्यावर आगमन झाले. या सुखांनो या ही त्यांची पहिली मराठी मालिका या मालिकेमुळे गिरीश परदेशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले.

याच प्रसिद्धीचा फायदा म्हणून त्यांनी फॉरेनची पाटलीन हा चित्रपट साकारला. चित्रपट मालिका हा प्रवास सुरु असताना काहीतरी वेगळं करायचं म्हणून सतरा अठरा वर्षांनी मालिकेत, चित्रपटात काम करणं त्यांनी थांबवलं आणि आपला पूर्ण वेळ नाट्यसृष्टीसाठी व्यतीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. थिएटर ट्रेनिंग सुरू करून अनेक व्यक्तींच्या संपर्कात राहणं आणि नाट्यसृष्टीशी जोडलं जावं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. रंगभूमीवर वेगवेगळे आणि तितकेच नाविन्यपूर्ण प्रयोग करून त्यांनी नाट्य सृष्टीत यश मिळवलं आहे. आजवर वेगवेगळ्या विद्यापीठात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलं आहे. गेल्या वर्षी कला क्षेत्रावर निर्बंध आल्यामुळे नाट्यसृष्टी पूर्णपणे कोलमडली होती. त्यावेळी केवळ कला क्षेत्रावर अवलंबून न राहता वेगळ्या कामाचा शोध घेत राहावा असं त्यांनी म्हटलं होतं.