अर्चना नेवरेकर ही मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहे. सुप्रिया पाठारे हिची ती धाकटी बहीण आहे हे बहुतेक प्रेक्षकांना माहीत नसावे. अर्चना जेव्हा शूटिंगला जायची तेव्हा सुप्रिया तिच्या सोबत जायची. यातूनच सुप्रियाला देखील अभिनयाची संधी मिळाली होती. त्याकाळात अर्चना नेवरेकर हिने चित्रपट मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अर्चना नेवरेकर यांनी मोठ्या कष्टातून हे यश मिळवले होते. पदरी चार मुली असल्याने अर्चनाचे वडील मानसिक दृष्ट्या त्रस्त झाले होते. अशातच त्यांचे निधन झाले त्यावेळी अर्चना अवघ्या पाच ते सहा वर्षांची होती. शाळेत शिकत असताना निलकांती पाटेकर आणि सुलभा देशपांडे यांनी अर्चनाला बालकलाकार म्हणून नाटकातून अभिनयाची संधी मिळवून दिली होती.

त्यावेळी नाटकातून मिळणारी रक्कम तिच्या कुटुंबासाठी मोठा आधार बनून गेली. आपण कमावलं तरच आपल्याला खायला मिळणार ह्याची जाणीव तिला बालवयातच झाली. मोठ्या जिद्दीने आणि हिंमतीने अर्चनाने मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. वासूची सासू हे अर्चनाने साकारलेलं पहिलं व्यावसायिक नाटक. ती फुलराणी, जन्मदाता , स्वप्न सौभाग्याचे, सुना येती घरा, वहिनीची माया अशा नाटकांमधून चित्रपटातून अर्चनाला अमाप प्रसिद्धी मिळत गेली. मराठी सृष्टीत चांगलं नाव झाल्यानंतर अशातच अर्चनाला हिंदी चित्रपटात झळकण्याची नामी संधी मिळाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्चनाने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. सुलेखा तळवळकर या आपल्या युट्युब चॅनलवरून सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असतात. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी अर्चनाला या मुलाखतीत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्चनाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. यातच त्यांनी एक धक्कादायक अनुभव देखील उघड केलेला पाहायला मिळाला. अर्चना नेवरेकर या मुलाखतीत हा खुलासा करताना सांगतात की, ‘ मी मराठी सृष्टीत चांगली स्थिरस्थावर झाले होते सगळी चांगली माणसं मला भेटत गेली त्यामुळे चांगली कामं मला मिळाली आणि माझा चेहरा ओळखला जाऊ लागला. मी कोणी मोठी सुपरस्टार वगैरे असे काही नव्हते मला त्या संधी आल्या पण होत्या एका हिंदी चित्रपटासाठी माझं सिलेक्शन झालं होतं.मी नावं नाही घेत पण खूप मोठा चित्रपट होता.

मी नाव नाही घेणार कारण पुढे खूप कॉम्प्लिकेशन्स येतील त्यांच्यामध्ये दोन मुलींचे सिलेक्शन झाले त्यात मी ती फिल्म करणार होते. पण ती फिल्म करण्यामध्ये त्यांची अट हीच होती की, तुमचं सगळं ओके आहे आम्ही तुमचं सीरिअल्स मधलं काम पण बघितलं आहे तुमचे फोटो पण चांगले आहेत तुम्ही हा सिनेमा करताय पण या चित्रपटात काम करायचं असेल तर तुला चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल.’ अर्चनाच्या या खुलास्यावर सुलेखा तळवळकर यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. अर्चना यावेळी पुढे सांगताना असे म्हणाल्या की त्यावेळी माझ्यासोबत जी दुसरी मुलगी सिलेक्ट झाली होती ती आजच्या घडीला टॉपला आहे. त्यावेळच्या आपल्याच बॅचची ती मुलगी आहे. मी शॉक झाले कारण निलकांती पाटेकर, सुलभा ताईंनी मला अभिनयाची संधी मिळवून दिली होती. पुढेही मला सहज चित्रपट मिळत गेले. दुसरी गोष्ट म्हणजे ही लोकं एक समज करू घेत असतात की ह्या बॅग्राउंड मधून आलेल्या स्ट्रगल केलेल्या मुली आपल्यासाठी सहज अव्हेलेबल असतात. कोणी गरिबीतून वर आलेली मुलगी लबाड आणि डॅम्बीसच असतात हा प्रॉब्लेम मी आणि सुप्रियाने सुद्धा फेस केला आहे. परंतु ह्या बाबत सुप्रिया कोणाच्या थोबाडीत द्यायला सुद्धा घाबरायची नाही.