७० आणि ८० चे दशक गाजवणारा एक महान अभिनेता म्हणजे, दादा कोंडके. “दादा कोंडके” हे नाव माहीत नाही असा कुणी मराठी माणुस शोधून पण सापडणार नाही. द्विअर्थी संवाद आणि विनोद ही दादांच्या चित्रपटांची खासियत होती. यावरून त्यांच्यावर अनेकवेळा टीकाही झाली. पण दादा कोंडके यांच्या सिनेमांचा एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग होता. या प्रेक्षकवर्गाने दादा कोंडके यांच्या चित्रपटावर प्रचंड प्रेम केले. दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षं राज्य केले. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

दादांनी मराठीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली आणि विशेष म्हणजे दादांचे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. दादांच्या या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. मराठीतील या महान अभिनेत्याचे १४ मार्च १९९८ साली निधन झाले. संपूर्ण जनमानस त्या दिवशी हळहळला होता. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. त्यांचा चेहरा नेहमी हसरा असायचा. कलाच होती ती दादांची. दादांच्या जीवनावर आधारित “एकटा जीव” हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांच्या जीवनातील आणि आयुष्यातील अनेक गोष्टी दादांनी त्यांच्या ‘एकटा जीव’ ह्या आत्मचरित्रात उलगडल्या. ह्या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या व्यक्तिगत आणि व्यासायिक गोष्टींवर मनमोकळेपणे लिहिले आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला दादा खऱ्या जीवनात खूपच मातीशी नातं जडलेला माणूस होता. दादांच्या जीवनावर ‘एकटा जीव’ हे आत्मचरित्र लिहिले गेले. ह्या आत्मचरित्रात दादांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला गेलेला आहे. परंतु आत्मचरित्राच्या शेवटच्या पानावर लिहिलेले दादांचे शब्द खूपच बोलके आहेत. हे शब्द प्रत्येक कलाकार आणि माणसाने वाचावे असेच आहे.

“एकटा जिव” या आत्मचरित्राच्या शेवटच्या पानावरील दादांचे शब्द प्रत्येक कलाकार आणि जीवंत व्यक्तीने वाचावे असे आहे. दादांच्या शब्दांचा अर्थ नक्कीच खूप मोठा आहे. “आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे ? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे ? माझं दुःख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी, काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे.” लोक देवाकडे काय काय नाही मागत, पैसा, नाव, आयुष्य, सगळंच. पण फक्त दादा सारखा अवलिया माणूसच माझी म्हणता येईल अशी माणसं मागू शकतो.