द कश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमा म्हटलं की तो कुणाला आवडणार आणि कुणाला नाही आवडणार हे समीकरण ठरलेलं असतं . सिनेमा बनवणाऱ्या निर्मात्या पासून ते कलाकारा पर्यंत प्रत्येक जण हे मान्य करत असतो की कुठलीही कलाकृती रसिकांना आवडेल आणि रसिक त्यावर भरभरून प्रेम करतील हे काही सांगता येत नाही पण आम्ही आमचं काम शंभर टक्के करून प्रेक्षकांपर्यंत एक चांगली कलाकृती देण्याचा प्रयत्न करत असतो . या सिनेमाच्या सगळ्या टीमने देखील अशाच प्रयत्नातून द काश्मीर फाइल्स हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आणला आहे .

गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे . पण एकीकडे सिनेमाचं कौतुक होत असताना दुसरीकडे या सिनेमाला ट्रोल देखील केले जात आहे. त्यामुळेच काश्मीर फाईल या सिनेमावरून होयबा आणि नायबा असे दोन गट पडलेलेही आपल्याला दिसून येतात . 1990च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित चित्रपट आहे. या सिनेमावर आत्तापर्यंत सेलिब्रिटी कलाकारांबरोबरच अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे .त्याचबरोबर कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये या सिनेमाचं प्रमोशन करण्याला नकार दिल्याच्या घटनेवर या सिनेमातील प्रमुख कलाकार अनुपम खेर यांनीही भाष्य केलं होतं . त्यामुळे हा सिनेमा अशा वेगवेगळ्या विधानांमुळे देखील चर्चेत आला आहे . समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करणारे अभिनेते नाना पाटेकर यांनीही नुकताच द काश्मीर फाईल्स या सिनेमा बाबत एक विधान केले आहे आणि या विधानामुळे पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा वाढली आहे . विशेषतः आजकाल प्रत्येक घटनेवर आपलं मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया या माध्यमावर सर्वजण आपली हजेरी नोंदवत असतात द काश्मीर फाइल्स या सिनेमा विषयीच्या अनेक प्रतिक्रियांचे वादळ ही सध्या सोशल मीडियावर उठले आहे . याच अनुषंगाने नाना पाटेकर यांना बोलतं करण्यात आले आणि त्यावरूनच नाना पाटेकर असं म्हणाले की द काश्मीर फाइल्स ही कलाकृती एक सिनेमा म्हणून पाहण्याची गरज आहे.

‘ अभिनेते नाना पाटेकर यांनी या वादावर भाष्य केलं आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या सिम्बीऑनलाईन मोबाईल अॅपच्या लॉंचिंगवेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन समाज माध्यमांत जे गट पडले आहेत, त्यावर नाना पाटेकर यांना प्रश्न विचारण्यात आला.यावर उत्तर देताना नाना म्हणाले की, ‘मला असं वाटतं की, इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहणे हे गरजेचे आहे आणि त्यांनी एकत्रच राहावे. यात जर गट पडत असतील, ते ते चुकीचं आहे. गट पडण्याची गरजच नाही. एखाद्या चित्रपटाबद्दल अशी काँट्रोव्हर्सी होणं हे बरं नाही.’
चित्रपटाविषयी तेढ जर कोणी निर्माण करत असेल, तर त्या माणसाला नक्की प्रश्न विचारा. कारण सगळे छान सलोख्याने राहत असताना, त्यांच्यामध्ये बिब्बा घालायची काही गरज नाही . चित्रपट आहे तो चित्रपटासारखाच पाहावा. त्यातील वस्तुस्थिती कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. यावरून गट निर्माण होणं साहजिक आहे. पण, म्हणून त्यातून समाजात तेढ निर्माण होणं हे काही योग्य नाही’, असे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले.