अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे काल ४ जानेवारी २०२२ रोजी हृदय विकाराने निधन झाले. सिंधुताई सकपाळ यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला अशी खंत व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर आला होता. त्यात अभिनेत्री तेजस्विनि पंडितने सिंधुताईची भूमिका बजावली होती. पण तेजस्विनीने सिंधुताई यांच्या निधनावर काहीच मत व्यक्त केलं नाही म्हणून तिच्यावर टीका करण्यात आली. या टिकेवर तेजस्विनीने नुकतेच उत्तर देण्याचे धाडस दाखवले आहे.

आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस….पोस्ट नाही केलं ? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडिया वरुन माणसाला ? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो ?! माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोन वरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले….कारण ती वेळ खरंच नाजूक होती.
माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही….पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला….कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस ! “अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.

अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते , त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील. लोकहो एक विनंती…. घाई घाई ने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे… त्यांना वेळ द्या.तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना की माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.
ओम शांती. माई….- तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई