मराठी चित्रपट सृष्टीत खलनायकी ढंगाच्या भूमिका रंगवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा आज १३ जुलै रोजी स्मृतिदिन आहे. चरित्र भूमिका, खलनायक अशा विविध भूमिकेतून ते प्रेक्षकांसमोर आले मात्र त्यांनी रंगवलेला खलनायक प्रेक्षकांच्या काळजात धडकी भरवणारा ठरला. चित्रपटाच्या पडद्यावर निळू फुले यांनी कोणताही आरडाओरडा न करता किंवा मोठ्या आवाजात संवाद न म्हणता केवळ मौनाने भीती निर्माण केली होती. त्यांची पडद्यावरची एन्ट्रीचं प्रेक्षकांच्या अंगाचा थरकाप उडवत असे. बालपण अतिशय खडतर प्रवासात गेलेल्या निळू फुले यांनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली होती. समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने ते प्रेरित झाले होते.

त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह, आंदोलनात सक्रीय सहभाग दिला होता. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्या नंतरही पिढी घडविणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे नेतृत्व केले होते. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्यातून त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले. आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, सामना, पिंजरा, सिंहासन, फटाकडी अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाची ताकद दाखवून दिली. आज त्यांच्या स्मृतीदिना निमित्त त्यांच्या हस्ताक्षरातील एक खास आंतरदेशीय पत्र शेअर करत आहोत. झी मराठी वाहिनीवर देवमाणूस ही मालिका खूप गाजली होती. याच मालिकेचा सिकवल देवमाणूस२ च्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेत वंदी आत्याचा नवरा म्हणजेच लालामामा अभिनेते, दिग्दर्शक डॉ शशिकांत डोईफोडे यांना हे खास पत्र स्वतः निळू फुले यांनी पाठवलं आहे. १० जुलै २००२ रोजी निळू फुले यांनी लिहिलेलं पत्र डॉ डोईफोडे यांना मिळालं.

निळू फुले यांची आठवण म्हणून डॉक्टरांनी हे पत्र आजही आठवणींच्या कुपीत छान जपून ठेवलं आहे. या पत्रात निळू फुले यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिथेही जाता येत नसल्याचा उल्लेख केला आहे. मात्र त्यांनी आपल्याला पत्र लिहिल्याबद्दल आभारही व्यक्त केलेले पाहायला मिळत आहे. पात्रातील मजकूर पुढील प्रमाणे … “मा. डॉ. शशिकांतजी आपले पत्र मिळाले. हल्ली प्रकृतीमुळे कुठे जाता येत नाही. विश्रांतीसाठी कार्मोळी ह्या गावी असतो. म्हणून आपल्याशी संपर्क झाला नाही. श्रीमती चेतनाताईंना मी ओळखतो त्यांचा एक सत्कार माझ्या हस्ते झालेला होता. ह्या सत्काराला येत आले नाही आलो असतो तर मला आनंद झाला असता.असो .. आपण आवर्जून पत्र लिहता पुन्हा आभारी. आपला मिळू फुले. ” ह्या पत्रानंतर २००५ साली देखील निळुफुले ह्यांच्याशी भेट झाल्याचा एक व्हिडिओ डॉ. शशिकांत यांनी सोशल मीडियावर टाकलेला पाहायला मिळतो. त्यामध्ये ह्या दोघांची चांगली मैत्री असल्याचं स्पष्ट्पणे दिसून येत.