
कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच ही मालिका आई मुलीच्या नात्याची एक गोष्ट आहे. या मालिकेत आपल्या मुलीला शोधण्यासाठी एक आई जगाशी कशी लढायला तयार होते तिचा हाच संघर्ष मालिकेतून दर्शवण्यात आला आहे. इतक्या दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर वेळप्रसंगी वेश बदलून ही मीनाक्षी आता आपल्या लेकीला म्हणजेच सुहानीला शोधून काढते. मात्र मालिकेत नुकताच एक ट्विस्ट देण्यात आला आहे. सुहानी सापडली असली तरी तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे मात्र तिच्याजवळ पोलिसांना ड्र ग्ज सापडले असल्याने सुहानी आता पुरती अडचणीत सापडली आहे.

मानसिंगच्या या प्लॅनमध्ये सुहानी कायद्याच्या कचाट्यात सापडली असल्याने तिला ड्र ग्ज प्रकरणातून सोडवण्यास कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. कुठलाही वकील तिची ही केस लढण्यास तयारी दर्शवत नसल्याने आता एक व्यक्ती वकील बनून तिची या प्रकरणातून सुटका करायला तयार झाली आहे. ही व्यक्ती कोण असणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. १७ एप्रिल रोजी आई मायेचं कवच या मालिकेचा महारविवार विशेष भाग प्रसारित होत आहे. या विशेष भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये सुहानीची केस लढायला एक वकील सज्ज झाली आहे. तिची पाठमोरी असणारी एक झलक या प्रोमोमधून पाहायला मिळाली. ही वकील कोण असावी? असे अंदाज प्रेक्षक सोशल मीडियावर बांधताना दिसत आहेत. मात्र बहुतेकांनी हा चेहरा ओळखलेला आहे. सुहानीची आई मीनाक्षी ही वकील आहे आणि त्यामुळे ती आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आता वकील बनून तिची केस लढणार आहे. त्यामुळे मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरला आहे.

मालिकेत भार्गवी चिरमुले हिने मिनाक्षीची भूमिका साकारली आहे तर अनुष्का पिंपूटकर हिने सुहानीची भूमिका बजावली आहे. मिनाक्षीला खंबीर साथ देणारा इन्स्पेक्टर भास्कर लोखंडे ही भूमिका वरद चव्हाणने त्याच्या अभिनयाने गाजवली आहे. नुकतेच या मालिकेने १०० भागांचा टप्पा पार केला आहे. यावेळी मालिकेच्या सेटवर महेश कोठारे यांनी हजेरी लावून मालिकेतील कलाकारांचे भरभरून कौतुक केले होते. मालिकेतील कलाकारांमुळे ही मालिका यशाचा एक एक टप्पा सर करत आहे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. महेश कोठारे यांनी अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. आई आणि मुलीच्या नात्याचा उलगडा या मालिकेच्या माध्यमातून करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. चुकीच्या वाटेवर पाऊल टाकत असलेल्या लेकीला आई योग्य मार्गावर आणण्याचा संघर्ष या मालिकेत दाखवण्यात आला आहे. महेश कोठारे यांच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे १०० भागांचा टप्पा पार ठरत असताना मजेश कोठारे खूपच उत्साहित झाले होते.