“रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी..” हे गाजलेलं गाणं एकेकाळी अंताक्षरी किंवा कुठल्याही शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात वाजल्याशिवाय आणि त्यावर ठेका धरल्याशिवाय तो कार्यक्रम पूर्णच होत असे म्हटले जात होते. हे गीत आहे १९६४ सालच्या “मराठा तितुका मेळवावा” या मराठी चित्रपटातील. आज या गीतातील नायिकेबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात… रेशमाच्या रेघांनी…या गीतातील नायिकेचे नाव आहे “जीवनकला”. जीवनकला यांच्या आई गंगुबाई आणि वडील दत्तात्रय (दत्तोबा) कांबळे हे पुण्यातील युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट मध्ये कलाकार म्हणून काम करत होते.

३० च्या दशकातील अनेक गाजलेल्या मुकपटातून या दोघांनी काम केले होते. २९ जून १९४४ रोजी दिवाकर वाड्यात जीवनकला यांचा जन्म झाला. याच वाड्यात मंगेशकर कुटुंब देखील राहत होते. लता दिदींनीच त्यांच्या आईला ‘जीवनकला’ हे नाव सुचवले होते. ६ वी पर्यंतचे त्यांचे शिक्षण हुजूरपागा शाळेत पूर्ण झाले तर वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांनी बाळासाहेब गोखले यांच्याकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेतले होते. घर लक्ष्मीरोडलगतच असल्याने नृत्याचा सराव करताना एक दिवस मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांनी घुंगरांचा आवाज ऐकला आणि घरी येऊन चित्रपटात काम करणार का अशी विचारणा केली. “अखेर जमलं” या चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मंगेशकर कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये नृत्य सादर करता आले. पुढे त्यांचे कुटुंब मुंबईत आल्यावर अकरावी पर्यतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. “गुंज उठी शहनाई” या गाजलेल्या हिंदी चित्रपटात ‘अंखीयां भूल गई…’ गाण्यात नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही किस्मत पलट के देख, सरस्वतीचंद्र, पारसमणी, पुत्र व्हावा ऐसा, चिमण्यांची शाळा, हा माझा मार्ग एकला, वैशाख वणवा, शेरास सव्वाशेर, मराठा तितुका मेळवावा, काळी बायको अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून सहकलाकार, खलनायिका आणि नृत्यांगना अशा विविध भूमिकेतून त्या चमकल्या. ‘जिथे सागरा धरणी मिळते…’, ‘अखेरचा हा तुला दंडवत…’, ‘हसता हुवा नुरानी चेहरा…’, ‘रेशमाच्या रेघांनी…’ अशी अनेक हिट गाणी त्यांच्यावर चित्रित झाली आहेत.

१९६५ साली त्यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी जीवनकला २१ वर्षाच्या होत्या वडिलांनी आपल्या एकुलत्या एक लेकीची काळजी सुलोचनादिदींकडे बोलून दाखवली होती. त्यावेळी सुलोचनाजींनी पटकथा संवाद लेखक राम केळकर यांचे लग्नासाठी स्थळ सुचवले. १९६९ साली जीवनकला या राम केळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतर जीवनकला यांनी अभिनयाला राम राम ठोकला त्यानंतर राम केळकर यांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटात यशस्वी लेखक म्हणून भूमिका बजावल्या . दुर्दैवाने पतीचे निधन झाल्यानंतर मुलांच्या संगोपनाची जबादारी जीवनकला यांच्यावर आली. योगेश, हेमंत आणि मनीषा ही त्यांची तीन अपत्ये. आज हेमंत एडिटर, रायटर, डायरेक्टर असून सुभाष घई यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो आहे तर त्यांची मुलगी “मनीषा केळकर” मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. मानिषाने बीएस्सी मायक्रोबायोलॉजी मधून पदवी मिळवली आहे. भोळा शंकर , बंदूक, झोल, लॉटरी, अशा हिंदी मराठी चित्रपटात मनीषा अभिनेत्री म्हणून झळकली आहे. झाला अनंत हनुमंत या चित्रपटात दोघी मायलेकिने एकत्रित काम केले . परंतु मनिषाला एक अभिनेत्री म्हणून आपल्या आई इतके यश मिळवता आले नाही. अभिनयातून ब्रेक घेतलेल्या जीवनकला यांनी मात्र नृत्याची आपली आवड आजही जपलेली पाहायला मिळते आहे. आज जीवनकला ७७ वर्षांच्या असूनही त्यांचे कथ्थक आणि लोकनृत्याचे क्लासेस आजही अविरत सुरू आहेत. त्यांच्या हसता हुवा नुरानी चेहऱ्यावर आजही तितकीच झळाळी पाहायला मिळते हे विशेष….