आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत त्याच्याशी दोन हात करत जेव्हा आपला संघर्ष कुठेतरी कमी पडतो त्यावेळी नको ते विचार आपल्या डोक्यात घर करून बसतात. याच भावनेने मराठी नाट्य तसेच सिने सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार “राजन पाटील” यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. मुळात राजन पाटील हे व्यक्तीमत्त्वच त्यांच्या चाहते आणि आसपासच्या मित्रमंडळी या सर्वांनाच आपल्या लेखणीतून नेहमी प्रोत्साहन आणि ऊर्जा देण्याचे काम करत असते. त्यामुळे माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे असे त्यांचे म्हणणे कुठेतरी जिव्हारी लागते. नुकतेच सोशल मीडियावरन त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की…

“नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलोय. माझं जगणं आता जगणं उरलं नाही. केवळ जिवंत राहणं एवढंच राहिलेय. मला त्यात स्वारस्य नाही. तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा. नमस्कार… …राजन पाटील.”… राजन पाटील यांनी असे का म्हटले आहे ते ठाऊक नाही पण त्यांच्या या पोस्टवर अनेक सह कलाकारांनी त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. आजारावर उपचार नक्कीच असतात खचून न जाता परिस्थिशी खंबीरपणे सामोरे जा असेच अनेकांनी त्यांना सुचवले आहे. राजन पाटील हे स्वतः लेखक आहेत. “रंग माझा”, “माझी माणसं” या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. शिवाय तरुण तुर्क म्हातारे अर्क, रायगडाला जेव्हा जाग येते, मित्र, शर्यत, बरड, मुंबई आमचीच, तोची एक समर्थ या आणि अशा अनेक नाटक, चित्रपट तसेच दूरदर्शनवरील अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तूर्तास ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील या आजारातून लवकरात लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा….